साहित्य :-
१. उभी चिरलेली हिरवी सिमला मिरची १ कप
२. उभी चिरलेली लाल, पिवळी सिमला मिरची प्रत्येकी अर्धा कप
३. उभं चिरलेलं पनीर ३/४ कप
४. २ ते ३ हिरव्या मिरच्या
५. १ चमचा किसलेलं आलं
६. जीरं १ चमचा
७. हळद पाव चमचा
८. गरम मसाला १ चमचा
९. उभं चिरलेला कांदा १ कप
१०. उभा चिरलेला टोमॅटो
११. सजावटीसाठी बारीक कोथिंबीर चिरलेली व आलं उभं चिरलेलं
१२. मीठ चवीनुसार
कृती :-
प्रथम सर्व भाज्या, पनीर, कांदा, टोमॅटो व हिरव्या मिरच्या हे सर्व चिरून घ्यावं. टोमॅटो चिरताना त्यातल्या बिया पूर्णपणे काढून घ्याव्यात. सर्व तयारी झाली की एका कढईमध्ये तेल तापवावं. त्यात जीरं घालावं व ते थोडं परतलं की मग कांदा घालावा. कांदा मऊसर होयीपर्यंत परतावा. मग त्यात आलं व हिरवी मिरची घालावी व १ मिनिटभर परतावं. आता त्यात सर्व प्रकारच्या सिमला मिरची घालाव्यात. एक ५ मिनिट झाकण न लावता शिजवाव्यात. मध्ये मध्ये भाजी परतावी. मग त्यात हळद व गरम मसाला घालावा. थोडं अजून तिखट हवं असेल तर लाल तिखट घालावं. भाजी पुन्हा थोडावेळ परतावी. मग त्यात पनीर घालावं. पनीर घातल्यावर भाजी अतिशय हलक्या हाताने परतावी. मग त्यात टोमॅटो व मीठ घालून भाजी पुन्हा ५ मिनिटं शिजू द्यावी. कोथिंबीर व आलं पेरून भाजी गरम गरम serve करावी. ही भाजी गरम गरम फुलाक्यांसोबत फारच छान लागते. शिवाय रंगीत सिमला मिरची नसेल तर साधी नेहेमीची हिरवी सिमला मिरची वापरली तरी चालेल.
वाढणी :- २ ते ३ माणसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा