साहित्य :-
१. २ कप पोळीची कणिक
२. १ चमचा हळद
३. २ चमचे तिखट
४. धना जीरा पूड प्रत्येकी २ चमचे
५. गरम मसाला ३ चमचे
६. तेल ४ ते ५ चमचे
७. १ कप चिरलेली कोथिंबीर
८. तूर डाळ १ कप
९. चवीनुसार मीठ
१०. ६ ते ७ कढीपत्त्याची पणे
११. २ ते ३ आमसुले / कोकम
कृती :-
प्रथम तूर डाळ दीड कप पाणी घालून कुकर मध्ये उकडून घ्यावी. पोळीची कणिक घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, धना जीरा पूड प्रत्येकी १ चमचा, दीड चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, थोडं तेल व कोथिंबीर घालावी. पोळीच्या कणिकेपेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळावी. आता कढईमध्ये तेलाची फोडणी करून त्यात मोहरी व कढीपत्ता घालावा व उरलेले सर्व मसाले घालावेत. उकडलेली डाळ थोडी मॅश करून कढईत घालावी. कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालावे. आमटी थोडी पातळ होण्यासाठी थोडं पाणी घालावं. आमसुले घालून आमटीला उकळी येऊ द्यावी व आमटी बारीक आचेवर उकळत ठेवावी. आता मळलेल्या कणिकेचे छोटे गोळे घेऊन त्यांना तेल लावून ते लाटावेत. पोळी लाटली की कातण्याने शंकरपाळीच्या आकाराचे तुकडे करावेत व आमटीमध्ये सोडावेत. आमटी थोडी उकळावी व तोवर दुसरी पोळी लाटून घ्यावी. आमटीमध्ये अशाप्रकारे पोळीचे तुकडे घातले की आमटी मध्यम आचेवर थोडावेळ उकळावी. म्हणजे कच्ची कणिक शिजेल. आमटी पातळ राहील इतपत तुकडे घालावेत. मध्ये मध्ये आमटी उकळत असताना ढवळावी. अशी तयार वरणफळे एका बाउलमध्ये घालून वरून कोथिंबीर घालून गरम गरम serve करावे. अतिशय झटपट होणारे हे पूर्ण जेवण आहे. वरणफळे वाढताना तूप आणि लिंबू त्यावर घालावे व मगच वाढावे.
वाढणी :- २ ते ३ माणसे